You are here:
वादे वादे जायते तत्त्वबोधः – २

सेमिनारमध्ये काहीवेळा फार वेगळ्या विषयाची माहिती मिळते. आपल्याला कल्पनादेखील नसते कि असा काही वाद या क्षेत्रात अनेक शतके सुरु असेल. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाने आयोजित केलेल्या Dialogue and Debate in Ancient India या सेमिनारमध्ये कालच्या दिवशी संहिता जोशी यांनी सादर केलेला पेपर अशा तर्‍हेचा होता. एखाद्या मार्गात संपूर्णपणे झोकून दिलेल्या व्यक्तीवर ती ज्ञानशाखादेखील कशी प्रसन्न असते याचे संहिता जोशी हे चालते बोलते उदाहरण आहे असे मला नेहेमी वाटते. पंचविशीच्या घरात असलेल्या या तरुण मॅडमनी आम्हाला “वेणीसंहार” नाटकाचा काही भाग शिकवला तेव्हाच त्यांचे संस्कृत आणि व्याकरणावरील प्रभुत्व जाणवले होते. आता तर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयात काही काम करीत आहेत.

पाणिनीची अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण आणि प्रमुख ग्रंथ. त्याचा थोडका परिचय झाला होताच. मात्र हा परिचय भट्टोजी दिक्षित यांच्या “सिद्धान्त कौमुदी” आणि वरदराज यांच्या “लघुसिद्धान्त कौमुदी” या दोन अतिशय लोकप्रिय ग्रंथांच्या माध्यमातून झाला होता. पाणिनीय व्याकरण या ग्रंथांच्या अभ्यासातूनच शिकवले जाते असा समज होता. संहिता जोशींच्या पेपरमुळे व्याकरण शिकविण्याच्या परंपरेत “अष्टाध्यायी क्रम” आणि “प्रक्रिया क्रम” अशा दोन पद्धती आहेत अशी माहिती मिळाली. मात्र पुढे जाऊन या दोन पद्धतींमध्ये कोणती पद्धत श्रेष्ठ आहे यावर या क्षेत्रात गेली काही शतके जहाल वाद सुरु आहे हे माझ्यासाठी तरी अगदीच नवीन होते.

पाणिनीच्या अष्टाध्यायीला सुलभ सोपे स्वरुप देण्यासाठी भट्टोजी दिक्षितींनी पाणिनीची सूत्रे समास, तद्धित वगैरे प्रकारांमध्ये विभागली आणि या तर्‍हेने अभ्यास करण्याच्या पद्धतीला “प्रक्रिया क्रम” हे नाव पडले. यावर टिकेचे मोहोळ उठले. महर्षी दयानंदांचे गुरु स्वामी विरजानंद हे मूळ अष्टाध्यायी क्रमाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या बाजूचे. त्यांनी प्रक्रियाक्रमाने अभ्यास करण्याची पद्धत थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या हयातीत चालवला. संहिता जोशींनी दोन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतींच्या बाजूने सांगितलेले काही मुद्दे स्पष्ट केले. अष्टाध्यायीक्रमाच्या बाजूने असलेल्यांनी प्रक्रियाक्रमाच्या बाबतीत नोंदवलेले आक्षेप आणि त्याला प्रक्रियाक्रमाच्या अभ्यासकांनी दिलेले उत्तर असे या वादाचे स्वरुप होते.

स्वतः संहिता मॅडमनी समन्वयाची भूमिका घेतली होती जी मला स्वतःला पटली आणि आवडली देखील. विखुरलेली सूत्रे अभ्यास करण्यास जास्त मेहनत घ्यावी लागते त्यामुळे काही विशिष्ट विभागात एकत्र केलेल्या सूत्रांमुळे पाणिनी अष्टाध्यायीचा अभ्यास जास्त सुलभ झाला आहे असे प्रक्रियाक्रमाच्या बाजूने त्यांनी मत देतानाच अष्टाध्यायीक्रमामुळे सूत्राचा मागचा पुढचा संदर्भ लगेच लक्षात येतो कारण त्यात सूत्रांचा मूळ क्रम बदललेला नसून तसाच ठेवलेला असतो असेही आवर्जून सांगितले. त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करताना या दोन्ही पद्धतींचा समन्वय केल्यास अभ्यास जास्त परिणामकारक होतो असा समारोप संहितामॅडमनी केला.

अशा तर्‍हेच्या वादाबद्दल माहिती देताना अनेक विद्वानांबद्दल बोलावं लागतं. आपल्याला न पटणारी मते जरी असली तरी या सर्व विद्वानांचे त्या कार्यक्षेत्रातील स्थान अतिशय महत्वाचेच असते आणि त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त अतीव आदरच वाटत असतो हे संहितामॅडमचे बोलणे ऐकताना वारंवार जाणवत होते. पूर्वपक्ष उत्तर पक्ष सांगताना त्या पुन्हा पुन्हा या सर्व ज्ञानी लोकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करीत होत्या. ज्ञान संपादन करीत असतानाच माणुस नम्र कसा होत जातो याते ते एक विलोभनीय दर्शन होते. संहितामॅडमच्या हाताखाली काही दिवस शिकायला मिळाले याबद्दल मला नेहेमीच कृतज्ञता वाटते. अतिशय सुरेख पेपर आणि प्रेझेंटेशनदेखील.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment