You are here:
रात भी है कुछ भीगी भीगी…

हिंदी सिनेसृष्टीत काही अतिशय प्रतिभावंत पण तितकीच दुर्दैवी माणसं होऊन गेली. त्यातील एक म्हणजे संगीतकार जयदेव. हा माणुस फारसा बोलत नसावा किंवा याला राजकारण खेळता येत नसावं. त्यामुळे इतकं जबरदस्त संगीत देऊनही जयदेव यांचं नाव पटकन घेतलं जात नाही. “अभी ना जाओ छोडकर”, “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” सर्वांना माहित असतं पण त्याचा संगीतकार जयदेव त्यातील पन्नास टक्क्यांना तरी ठावून असेल का शंकाच वाटते. हात लावेल त्याचं सोनं करणारा हा माणुस. त्यांचे सामान्य गाणे मला आठवत नाही. जयदेवच्या कारकिर्दीतील गाणी पाहताना “मुझे जीने दो” चा उल्लेख करावाच लागेल. खास करून “रात भी है कुछ भीगी भीगी” या गाण्यासाठी. जयदेवचे संगीत त्याच्या समकालिनांपेक्षा वेगळे असायचे हे येथे देखिल दिसुन येते. चाल सोपी नाही पण अतिशय गोड. त्यातुन लताचा कोवळा आवाज. तिने घेतलेल्या ताना अतिशय मधुर वाटतात. एका ठिकाणी तर एकाच श्वासात ती तान घेत पुन्हा “रात भी है कुछ” वर येते. काही गाण्यांसाठी लताला पर्याय नव्हता हेच खरं.

मान्य कि सुनिल दत्त म्हणजे राज कपूर किंवा दिलिपकुमार नाही. मात्र त्याची अभिनयाची स्वतःची एक शैली आहे. विशेषतः डाकूच्या वेषात त्याच्याइतके चपखल ते दोघेही दिसणार नाहीत असे मला वाटते. तो फेटा, तो टिळा उंच्यापुर्‍या सुनिलदत्तला शोभुन दिसतात. “मुझे जीने दो” मधल्या “रात भी है कुछ भीगी भीगी” मध्ये सुनिलदत्तने वहिदाला पाहुन अंतर्बाह्य पेटलेला डाकू मस्त दाखवला आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच तो थबकतो. आणि गाणं ऐकायलाच येऊन बसतो. त्यानंतर दौलतजादा सुरु होते. मध्येच कलावंतीणीचा हात पकडण्याचाही प्रयत्न होते. हळुहळु कट शिजू लागतो. डाकूच ते. एकमेकांमध्ये कानगोष्टी होतात. त्याकाळच्या चित्रपटांमधले हे वातावरण अगदी खरे वाटायचे. आणि वातावरणातला तणाव आपल्यालाही जाणवायचा जसा या गाण्यात जाणवतो.

वहिदाच्या नृत्यकौशल्याबद्दल वादच नाही. मात्र त्याबरोबरच अभिनयही अविस्मरणीय. या गाण्यात ती नजरेनेच बोलते. बरेचसे टाईट क्लोजअप्स घेतले आहेत. “किसको बताये कैसे बतायें” या ओळीत वहीदा हलकेच ओठ चावते. आपल्याकडे काही वेळा ही कृती इतक्या रांगडेपणाने केली जाते की ती नुसती अश्लीलच नाही तर क्वचित विभीत्सदेखिल वाटते.पण वहिदाने हा तोल सांभाळला आहे. शेवटी हे गाणे कोठ्यावर नाचणार्‍या कलावंतीणीचे आहे मात्र त्याला धसमुसळ्या तमाशाचे स्वरुप दिलेले नाही. माणसेही गडबड न करता गाण्याचा आनंद घेताना दिसताहेत. एका हवेलीत गाणे सुरु आहे. बहुधा त्यामुळे ही शिस्त पाळली जात असावी. आरशासारख्या जमिनीवर वहिदाचं प्रतिबिंब पडत असताना चित्रित केलेलं गाणं मला छायाचित्रणाच्या दृष्टीनेदेखिल आवडतं.

गाण्यात अनेकांचे क्लोजप्स आहेत. काही कलावंत जो काही अभिनय करतात त्याला फक्त अप्रतिम हेच विशेषण लावता येते. लीला मिश्रा, ए.के हंगल ही अशी माणसं. त्यातलीच एक मनोरमा. मालकिणीच्या भुमिकेत ती येथे दिसते. फक्त काही सेकंदात तिने चेहर्‍यावर लोभट आणि मिंधेपणाचा जो भाव दाखवला आहे तो अतिशय परिणामकारक. सुनिलदत्त दौलतजादा करायला सुरुवात करतो तोपर्यंत ती नम्रपणाचा आव आणत असते. मात्र त्याने पैशाची थप्पी बंदुकीच्या टोकावर ठेवताच तिचा अनुभवी चेहरा बदलतो, संशयी होतो. हे सर्व मुळातूनच पाहण्याजोगे. एका ठिकाणी सप्रू दिसला आहे. फक्त नजरेतून बोलणारा. खरं तर या अशा कलावंतांमुळेच दृश्याचा एकंदर परिणाम गडद होत असतो.

हे एक सूचक शृंगाराचे गाणे आहे. “तुम आओ तो आंखे खोले सोयी हुई पायल की छमछम” असे साहिर लुधियानवी लिहून जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते. शृंगाराचा परिपोष करण्यासाठी आयटेम साँगची गरज नाही, कपड्यांची लांबीरूंदी तर कमी करण्याची मुळीच गरज नाही. तेथे वहिदासारखी अप्सरा हवी, ते खानदानी सौंदर्य हवे, ते अभिनय कौशल्य हवं, साहिरचे शब्द हवेत. जयदेवची धून हवी आणि तो लताचा आवाज हवा 🙂

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment