You are here:
भेटू आनंदे – १ – श्री. शरच्चंद्र पटवर्धन

अनेकदा असं पाहिलंय की शैक्षणिक पार्श्वभूमी कुठलीही असु देत, काहींचा पिंड संशोधकाचा असतो. आणि अशी माणसे समाजाभिमुख असली म्हणजे थक्क करणारी कामे करतात. आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य असलेले पटवर्धन साहेब म्हणजे अशाच व्यक्तींपैकी एक. भेटू आनंदेच्या पहिल्या ऑनलाईन सभेला पटवर्धनसाहेबांसारखा वक्ता बोलायला येणं हे खरं तर आमचं भाग्यच. त्यांना काही वर्षापूर्वी प्रत्यक्ष भेटलो होतो. शोभनाताईंकडून त्यांच्याबद्दल अनेकदा ऐकलंही आहे. संशोधनात रमणारे, अतिशय प्रेमळ स्वभावाचे आणि प्रसिद्धी पराङ्मुख असे हे व्यक्तीमत्व. त्यादिवशी भेटू आनंदे मध्ये पटवर्धनसाहेब जेव्हा बोलु लागले तेव्हा हे हाडाचे संशोधक आहेत हे स्पष्टपणे दिसून आले. आणि त्यांचे संशोधन हे लोकाभिमूख असते. आज कोविड काळात आजूबाजूला पन्नासहून जास्त वय असलेली माणसे जेव्हा रास्तपणे स्वतःची काळजी घेण्यावर भर देताहेत तेव्हा वयाची ऐशी वर्षे उलटलेल्या पटवर्धनसाहेबांच्या मनात कोविडग्रस्त माणसांसाठी स्वमदतगट काढावा असे विचार घोळत आहेत. आणि त्यानूसार ते माहिती काढत आहेत. सूक्ष्म संशोधन करणारी माणसे ज्याप्रमाणे आकडेवारी आणि तपशीलांवर भर देत असतात त्याप्रमाणे कोविडसंदर्भात आता ते सर्व माहिती जमवत आहेत. पटवर्धनसाहेबांच्या पत्नीला पार्किन्सन्स होता आणि तेव्हा पार्किन्सन्स रुग्णांसाठी स्वमदतगट काढावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्याच दरम्यान शेंडेसाहेबांसारखी स्वतः त्या आजाराला तोंड देणारे समविचारी स्नेही त्यांना भेटले. पुढे अनिल कुलकर्णी, डॉ. शोभना तीर्थळी यांच्यासारखी माणसे या कार्याला जोडली गेली आणि पटवर्धनसाहेबांनी लावलेला पार्किन्सन्समित्रमंडळाचा वेलु गगनावरी गेला.

कसलातरी ध्यास घेतलेली माणसे स्वस्थ बसत नाहीत. आज मंडळाचे नाव चोहीकडे झाले आहे तरी पटवर्धनसाहेबांचे मंडळाच्या संदर्भात, रुग्णांच्या संदर्भात प्रयोग सुरुच आहेत. व्यवसायाने ते इंजिनियर पण तज्ञ संशोधकाप्रमाणे ते डाटा गोळा करून त्यावर काम करीत असतात. भेटू आनंदेच्या सभेला त्यांनी प्रामुख्याने आपल्या अशाच एका प्रयोगाची माहिती दिली. पार्किन्सन्सचे काही रुग्ण शय्या ग्रस्त असतात. त्यांना अर्थातच कुठे बाहेर जाता येता येत नाही. अशावेळी घरच्यांवर अवलंबून राहणे हे देखिल संकोचाचे वाटते. अशा रुग्णांच्या मनोरंजनासाठी सुंदर गाणी रेकॉर्ड केलेला एमपीथ्री प्लेयर द्यावा अशी कल्पना पटवर्धनसाहेबांच्या मनात आली. पण ही नुसतीच कल्याणकारी कल्पना नव्हती. त्यामागे काही विचार होता. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून काही एमपीथ्री प्लेयर्स रुग्णांना वाटले. त्यानंतर त्याप्लेयर्समुळे रुग्णांचा वेळ कसा गेला, त्यांच्या मनोवृत्तीत कितपत फरक पडला याचा ते मागोवा घेऊ लागले. काहींनी याबद्दल फार चांगला फिडबॅक देऊनही पटवर्धनसाहेबांना अपेक्षेप्रमाणे या प्रयोगात यश आले नाही. तेव्हा त्यांनी “आमचे नक्की कोठे चुकले” यावर चिंतन सुरु केले. सदोदित पार्किन्सन्स रुग्णांच्या समस्यांचा विचार करणारे पटवर्धनसाहेब रुग्णांना झोप येत नसल्यास त्यांनी सुंदर कल्पना मनाशी घोळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगतात. पार्किन्सन्सच्या रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास असण्याची शक्यता असते. त्यावरही त्यांनी लेखन केले आहे.

रुग्णांसाठी सतत कार्यरत असणारे पटवर्धनसाहेब हे प्रसिद्धी पराङ्मुख आहेत. आमच्या इतर सभांना ते सर्वसामान्य सदस्यांप्रमाणेच येतात. आपल्या शंका विचारतात. भेटू आनंदेच्या दिवशी त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना प्रचंड खोकला येत होता. पाहतानादेखिल आपचा जीव कासाविस होत होता. पण पटवर्धनसाहेब पटकन उठून आपले औषध घेऊन आले आणि त्यांनी आपले बोलणे सुरु केले. ते मध्यंतरी आजारी असताना त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत काय होती त्याचा उहापोह केला. त्यावरून आजारपणात माणसाने सकारात्मक वृत्ती कशी ठेवावी याचा जणु आम्हा सर्वांना वस्तुपाठच मिळाला. आजार आहे मात्र अजूनही मी बेशुद्ध पडलेलो नाही. म्हणजे माझी स्थिती चांगली आहे. अजूनही मी विचार करु शकतो म्हणजे माझी स्थिती चांगली आहे. अशातर्‍हेने कुठल्याही दुखण्यात जी काही चांगली गोष्ट असेल त्यावर मन केंद्रित करून मनाला सकारात्मक कलाटणी द्यायची आणि एकंदरीतच मन आणि शरीर सकारात्मक उर्जेने भरून टाकायचे अशा तर्‍हेचं तंत्र त्यांनी वापरलं होतं. विषय कुठलाही असो, पटवर्धनसाहेब त्याच्या अगदी सूक्ष्म पैलूंना हात घालतात. जुन्या नाटकमंडळांची नावे या अगदी वेगळ्या विषयावर त्यांचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी खुप पायपीट करून माहिती जमवली आहे. काही मंडळांची मनोरंजक नावेही त्यांनी आम्हाला सांगितली. यासाठी सर्व प्रवास ऐशीच्या वर वय असलेले पटवर्धनसाहेब सायकलने करतात हे ऐकून त्यांना मनोमन दंडवत घालावेसे वाटतात.

माझा वावर शैक्षणिक क्षेत्रात असल्याने अनेक विद्वान आणि प्रकांडपंडित पाहिले. बरेचसे बोलघेवडे होते. त्यांच्या विचारांमागे कृतीची तपश्चर्या नव्हती. त्यामुळे त्यांचा निदान माझ्यावर तरी फारसा परिणाम झाला नाही. पटवर्धनसाहेबांसमोर मात्र नेहेमीच नतमस्तक व्हावेसे वाटते कारण ते फारसे बोलत नाहीत. त्यांचे कार्यच बोलत असते. त्यांनी मंडळ सुरु केले, त्यासाठी ते अविरत झटले, आजही झटत आहेत. मात्र त्या मंडळाची सर्व धूरा इतरांच्या खांद्यावर सोपवून पटवर्धनसाहेब पुन्हा आपल्या संशोधनाकडे वळले. आपल्या परंपरेत साधू कुणाला म्हणावे, त्याला कसे ओळखावे याच्या खुणा संतांनी सांगितलेल्या आहेत. घरात पत्नीला दुखणे होते म्हणून समाजात तसे दुखणे असलेल्या सर्वांच्या मदतीसाठी मंडळ काढण्याची कल्पना ज्यांच्या मनात येते त्या माणसाकडे पाहूनच मला आता साधू कसा ओळखावा हे नक्की ठावूक झालं आहे.

अतुल ठाकुर

“भेटु आनंदे” हा पार्किन्सन्स मित्रमंडळ पुणे या पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थी आणि शुभंकरांसाठी चालवली जाणार्‍या स्वमदत गटाचा उपक्रम आहे. या अंतर्गत आम्ही ऑनलाईन सभा घेऊन त्यात मंडळातील कलाकारांचे कायक्रम करतो. या कार्यक्रमांच्या अंतर्गत शुभार्थी शुभंकरांचे मनोगत, बाहेरील कलाकारांना निमंत्रण देऊन त्यांचे कार्यक्रम, कथाकथन, कलाप्रदर्शन अशा अनेक गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment