समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर तुम्ही काय म्हणाल? काहीजण म्हणतील ती स्वतःच्या शरीराची काळजी घेते आहे. काहीजण खवचटपणे असेही म्हणतील की ती स्वतःचे लाड करते आहे. पण जर तुम्हाला असं कळलं की ही स्त्री रक्तदान करताना आपल्या हिमोग्लोबिनची पातळी योग्य राहावी म्हणून असा आहार घेत असते तर तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल निश्चितपणे आदर वाटू लागेल. तर गेल्या भेटू आनंदेत आमच्या अंजलीताई महाजन यांची आम्हाला नव्याने ओळख झाली. त्यांना रक्तदानाचा छंदच आहे असं म्हटलं तरी चालेल. हे महादान असलेलं पुण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलं आहे. त्यांचा रक्तगट ओ आरएच निगेटिव्ह आहे आणि तो इतका दुर्मिळ असतो की फक्त सात टक्के लोकांमध्ये हा रक्तगट आढळतो आणि ज्यांना या रक्तगटाची गरज भासते त्यांना दुसरा रक्तगट चालतच नाही. म्हणून अंजली ताईंना अनेक ठिकाणहून बोलावणे येते. अशावेळी गरजू माणसाचे प्राण वाचावे म्हणून त्या वर सांगितलेला आहार घेत असतात. कारण हिमोग्लोबिनची पातळी खालावल्यास रक्तदान करता येत नाही.
कार्यक्रमात बोलताना अंजलीताईंनी सुरुवातीला रक्तदानाबद्दल बरीच तांत्रिक माहिती रंजक पद्धतीने सांगितली. नंतर त्या आपल्या आठवणींकडे वळल्या. त्यातली एक आठवण फार गमतीदार होती. त्यांनी एकदा घरी संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू ठेवले होते आणि त्यांच्या दोन मुली तयारीला लागल्या होत्या. आमंत्रणे गेली होती. बायका यायची वेळ झाली आणि नेमका रक्तदानासाठी फोन आला. अंजलीताईंना फोन याचा अर्थ गंभीर बाब. कारण ज्याला रक्ताची गरज आहे त्याला ओ आर एच निगेटिव्ह शिवाय दुसरे रक्त चालणारच नाही. अंजलीताईंनी आपल्या स्वभावानूसार महादानाला प्राधान्य दिले आणि त्या रक्तदानासाठी निघाल्या. जाताना त्यांनी मुलींना सांगून ठेवले होते की आईला अचानक बाहेर जावं लागलं असं सांगा. रक्तदानाला गेली आहे असं सांगण्याची गरज नाही. कारण मग माणसे उगाच तेथे जाण्याच्या निकडीबद्दल चर्चा करीत राहतात. पण बायका आल्यावर जेव्हा त्यांना अंजलीताई दिसल्या नाहीत तेव्हा प्रत्येकीने त्यांच्या मुलीला आई कुठे गेली ते विचारण्यास सुरुवात केली. शेवटी मुलींनी खरं काय ते सांगायचं ठरवलं. बायकांना तिळगुळ देताना त्या म्हणायच्या “तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आई गेलीय रक्तदानाला”. दुसऱ्या दिवशी ही सगळी गंमत अंजलीताईंना इतर बायकांकडून कळली.
अंजलीताईंना अनेकदा निरनिराळे अपघात झाल्यावर, विशेषतः सैन्यातले जवान जखमी झाल्यावर रक्त देण्यासाठी जावे लागले. काहीवेळा जखमींकडे, किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुसरे काहीही नसे तेव्हा ते चक्क अंजलीताईंच्या पाया पडू लागत. श्रींमंत माणसे सोन्याच्या दागिन्यांची भेट घेण्याची विनंती करीत. पुण्यकर्म आणि कर्तव्य म्हणून रक्तदान करणाऱ्या अंजलीताईंनी या भेटी कधीही स्वीकारल्या नाहीत. अंजलीताईंची रक्तदानावरची निष्ठा इतकी जबरदस्त की त्या मुख्याध्यापिका असताना त्यांनी आपल्या शाळेत पालकांसाठी रक्तदानाची शिबिरे आयोजित करणास सुरुवात केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुई पाहून घाबरणाऱ्या बायका हसत खेळत रक्तदानाला येऊ लागल्या ही किमया अंजलीताईंचीच. आज वयाची साठी उलटल्यामुळे अंजलीताई रक्तदान करु शकत नाहीत. मात्र आजही त्या रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे सारे करीत असताना अंजलीताईंच्या कुटुंबाकडे पाहिले तर मन अचंबित होते. दुर्दैवाने त्यांची एक मुलगी कॅन्सरने गेली. त्यांनी अनेक वर्षे आपल्या सासुबाईंना सांभाळले ज्यांनी शंभरी पार केली होती. शिवाय अंजलीताईंच्या पतीला पार्किन्सन्सचा आजार होता. या सर्व आघाड्यांना यशस्वीपणे तोंड देत त्यांनी आपली प्रकृती चांगली ठेवली होती. का? तर आपला रक्तगट दुर्मिळ आहे आणि त्यामुळे इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला रक्तदान करता यावे म्हणून!
अंजलीताईंना आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. आजही त्या अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या उत्तम कविता करतात. मनाचा उत्साह वाढेल असे त्यांचे लेखन असते. त्यांना नृत्याचीही आवड आहे. आमची त्यांची ओळख ही पार्किन्सन्स मित्रमंडळामुळे आहे. बाकी आमच्या मंडळात अशी थक्क करणारी अनेक मंडळी आहेत. अगदी कालपरवाचे उदाहरण सांगायचे तर तरुणाने व्यायाम करणे यात नवलाचे काहीच नाही. पण आपल्या पार्किन्सन्स झालेल्या आईला अटेंडंट मदतीला नसताना बेडवरून उचलता यावे म्हणून व्यायामाला सुरुवात करणारा तरुण तुम्ही पाहिला आहे का? तो आमच्या मंडळात आहे. अंजलीताईदेखील याच मार्गातल्या. खायचे कशासाठी तर रक्तदान करता यावे म्हणून. मला हा निव्वळ विचारदेखील चकीत करणारा वाटतो. आणि म्हणूनच अंजलीताईंसमोर आपोआपच हात जोडले जातात आणि आपण नतमस्तक होतो.
अतुल ठाकुर
“भेटु आनंदे” हा पार्किन्सन्स मित्रमंडळ पुणे या पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थी आणि शुभंकरांसाठी चालवली जाणार्या स्वमदत गटाचा उपक्रम आहे. या अंतर्गत आम्ही ऑनलाईन सभा घेऊन त्यात मंडळातील कलाकारांचे कायक्रम करतो. या कार्यक्रमांच्या अंतर्गत शुभार्थी शुभंकरांचे मनोगत, बाहेरील कलाकारांना निमंत्रण देऊन त्यांचे कार्यक्रम, कथाकथन, कलाप्रदर्शन अशा अनेक गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आई गेलीय रक्तदानाला – अंजली महाजन (भेटू आनंदे)