You are here:
एक डोळ्यात अंजन घालणारा प्रोत्साहन सोहळा

आमच्या उज्वलाताईंनी त्यांच्या सरस्वतीदेवी विद्या विकास ट्र्स्ट तर्फे होणाऱ्या आजच्या कार्यक्रमाबद्दल आधीच सांगितले होते. त्यामुळे रविवारची सकाळ या कार्यक्रमासाठी मोकळी ठेवली होती. आमच्या संस्कृतच्या प्राध्यापिका डॉ. गौरी माहुलिकर मॅडम सन्माननीय अतिथी म्हणून येणार होत्या. उज्वलाताईंच्या वर्गात संस्कृतच्या व्याकरणाची भीती गेली आणि माहुलिकरमॅडमनी या विषयातील रसास्वाद कसा घ्यावा ते शिकवले. संस्थेचे संस्थापक डॉ. पराडकर हे पुन्हा संस्कृतचे प्रकांड पंडित. न कळत्या वयात त्यांना टीव्हीवर पहून तेव्हाही भारावल्यासारखे झाले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या अतिथी डॉ. मंजूषा कुलकर्णी पुन्हा संस्कृतच्याच. यामुळे या कार्यक्रमाला संस्कृतचा एक भरजरी पदर होताच. थोडा लवकर पोहोचलो. उज्वलाताईंची लगबग सुरु होती. एकेक जण येत होते. स्टेज सुंदर सजवलेले होते. कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला संस्कृत विषयात कॉलेजात पहिल्या आलेल्या विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्याचे कौतूक करून हा सोहळा सुरु झाला.

कोरोना काळात भल्याभल्यांच्या नाड्या आखडल्या असतानाच या ट्रस्टने मदतीसाठी कसलेही आवाहन न करताच ट्रस्टकडे १४ लाख रुपये जमले हे ऐकूनच गार झालो. आजच्या कार्यक्रमात जवळपास पन्नासहून अधिक संस्था आणि गरजू विद्यार्थ्यांना संस्थेने अर्थिक मदत केली. ज्या संस्थांना मदत देण्यात येत होती त्यांची माणसे येत होती आणि उज्वलाताई त्या संस्थंची माहिती सांगत होत्या. त्या माणसांना दंडवतच घालावेसे वाटले. कुणी दुर्गम भागात काम करीत होते. कुणी अनाथ मुलांची आयुष्य सावरायला घडपडत होते. कुणी तर अशा वस्तीत काम करताना आढळले जेथिल माणसे खायला काहीही नाही म्हणून पक्षीच मारून खात होती. तेथे खाडे नावाचे सर त्या मुलांसाठी खाऊ आणत. त्या खाऊच्या मोहाने मुले त्यांच्या शाळेत येत. मग ते त्यांना खायला घालत आणि शाळेचा दरवाजा लावून टाकत. मग त्यांना अभ्यास शिकवित. अशा तऱ्हेने सुरुवातीला खाडे सरांनी त्या मुलांना शिक्षणाची गोडी लावली.

अनेक शाळांना सरकारची पुरेशी मदत नव्हती. एका शाळेला साउंडसिस्टीम घेण्यासाठी संस्थेने धनादेश दिला. जो सध्यातरी अपुरा होता. पुढल्या वर्षी पूर्ण देण्याचे आश्वासन उज्वलाताईंनी दिले. अनेक माणसांनी या कठीण कामांमध्ये झोकून देताना स्वतःचे सुखी आयुष्य बाजूला ठेवले होते. दुसऱ्याचे आयुष्य जास्त सुखी व्हावे, सुकर व्हावे, ज्याला संधी मिळाली नाही त्याला ती मिळावी यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. संस्थेचा दानयज्ञ सुरु होता आणि स्वीकार करणाऱ्यांचा ज्ञानयज्ञ सुरु होता. एक छान कल्पना या कार्यक्रमात राबवली जाताना दिसली. धनादेश हे अतिथी, अध्यक्ष यांच्या सोबतच हितचिंतक, देणगीदार यांच्याही हस्ते दिले जात होते. आपण केलेले दान हे सत्पात्रीच पडते आहे हे दान करणाऱ्याला तात्काळ कळत होते. त्यासोबतच मदतीची गरज असणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी, त्यांचे पालक किंवा नातेवाईक अशी मंडळी स्टेजवर येऊ लागली. हा गहिवरून टाकणारा प्रसंग होता.

कुणाची आई घरकाम करीत होती, कुणाच्या वडिलांना काम नव्हते, कुणाच्या वडिलांना कामात पुरेशी कमाई नव्हती. कोरोनाने तर सर्वांचीच परिस्थिती अवघड करून टाकली होती. अनेकांच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले होते. एका मुलाची आई अपंग तर वडिल अंध होते. शाळा शिकणारे, कॉलेजात जाणारे, वेगवेगळे कोर्सेस करणारे अनेक विद्यार्थी आज मदत घेऊन गेले. या मदतीने त्यांना पुढे शिकण्यास उभारी मिळणार होती. अभ्यास करताना “आता फी कशी भरू?” हा भीतीदायक प्रश्न त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या आईवडिलंसमोर आ वासून उभा राहणार नव्हता. उज्वलाताईंची ही संस्था १९९२ सालापासून कार्यरत आहे. तेव्हापासून असंख्य विद्यार्थ्यांना संस्थेने मदत केली असेल. ते विद्यार्थी आज उच्च स्थानी पोहोचून संस्थेचे देणगीदार बनले आहेत हे देखील संस्थेचे मोठेच यश आहे.

व्यासपीठावरील सर्व माननीय अतिथी आणि अध्यक्षांची यथोचित भाषणे झाली.
अध्यक्ष असलेल्या मेधा कुळकर्णी संपर्क नावाच्या संस्थेच्या संस्थापिका आहेत. आणि ही संस्था वैचारिक क्षेत्रात काम करीत आहे. नंतर झालेल्या माहुलिकरमॅडम यांच्या छोटेखानी भाषणात त्यांनी ऋग्वेदातील भिक्षूसुक्ताचा उल्लेख केला आणि एकमेकांना मदत करण्याची आवश्यकता सांगितली. माहुलिकरबाईंचे आजचे भाषण हे एखाद्या अल्पाक्षरी परंतू अर्थाने ठासून भरलेल्या सूत्राप्रमाणे झाले. त्यांनी दानाबद्दलचे सुभाषित सांगून संपत्तीच्या तीन गती असतात. एक दान, दुसरी उपभोग आणि तिसरा नाश. याशिवाय संपत्तीला कुठलीही गती नसते. त्यांनी संपत्तीचा आकंठ उपभोग घ्यावा कारण वेदांपासून प्रवृत्तीमार्गच सांगितला गेला आहे हे सांगून, ती दानदेखील करावी मात्र दान करताना ते दान सत्पात्री असावे हे देखील मुद्दाम अधोरेखित केले. माहुलीकरबाई स्वतःच या संस्थेच्या देणगीदार आणि हितचिंतक असल्याने त्यांचे मार्गदर्शन संस्थेला मिळत असतेच. सुग्रास पोटभर जेवलेल्या माणसाला जेवण घालण्यात अर्थ नसतो असे असे उदाहरणदेखील त्यांनी दिले. येथून मदत घेणाऱ्यांची माहिती ऐकताना ही मदत सत्पात्रीच जात आहे हे आम्हा सर्वांना दिसत होतेच. शेवटी महुलीकरबाईंनी पैसे दान केल्यास सत्कारणी लागतील, हंड्यांमध्ये घालून जमिनीत पुरुन ठेवल्यास पुढील पाचसहा पिढ्यांनंतर कुणालातरी मिळतील असे सांगून एक प्रकारे सर्वांना दानाबद्दलआवाहनच केले.

प्रोत्साहनसोहळा संपत आला होता. सुरेख जोशींच्या सुरेल आवाजात राष्टगीत झाले. सर्वासाठी अल्पोपहार होता. त्याआधी माहुलिकरबाईंना भेटलो. उज्वलाताईंना भेटलो. दोघांच्याही पायाला हात लावून नमस्कार करण्याचा आजचा भाग्याचा दिवस होता. लोकांमध्ये मिसळताना माझे विचारचक्र सुरु झाले. हा माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा कार्यक्रम होता. नुसते बोलणे, लिहिणे पुरेसे नाही. प्रत्यक्ष काम हवे. आपण साध्यासाध्या गोष्टींमध्ये हवा तसा खर्च करतो आणि इथे पुस्तकं, वह्या, शिक्षणाची फी, दोन वेळचे जेवण यासाठी माणसे धडपड करतात. त्यासाठी असंख्य मदतीचे हात उभे राहतात. आणि सरस्वती विद्या विकास ट्रस्ट सारख्या संस्था मदतीच्या वाटा सुकर करतात. सुरुवातीलाच उज्वलाताईंनी संस्थेचे अध्यक्ष क्षीरसागरसाहेब, जे वृद्धपकाळामुळे आज येऊ शकले नाहीत त्यांचे भाषण वाचून दाखवले. त्यात क्षीरसागरसाहेबांनी गौतम बुद्धांचे अतिशय मार्मिक उहाहरण दिले होते. ते त्यांना साने गुरुजींच्य सहवासात असताना खुद्द परमपुज्य साने गुरुजींनी दिल्याने मला फार भावले. बुद्ध म्हणतो रस्त्यात काटा दिसला तर तो बाजूला करा. तो कुठून आला, येथे कसा पडला हे शोधायच्या भानगडीत पडू नका. शक्य झाल्यास लोकांची दुःखं दूर करा. निदान नवीन दुःख निर्माण तरी करु नका. अनेक बोलघेवडे विद्वान पाहात आलेल्या मला या उदाहरणामुळे एक दिशा मिळाल्यासारखे वाटले आणि आजचा दिवस सत्कारणी लागला.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment