फक्त आजचा दिवस – १७ – उपचारांमध्ये तुमचे मन आहे का?

नमस्कार,

मुक्तांगणमध्ये एकापेक्षा जास्त अ‍ॅडमिशन घेणारी काही मंडळी आहेत. त्यांना पहिल्या अ‍ॅडमिशननंतर फारसा फरक पडत नाही. बाहेर आल्यावर ते पुन्हा लगेचच व्यसनाच्या मार्गाला लागतात. याची अनेक कारणे आहेत. पण सर्वात महत्त्वाचे कारण व्यसनी माणसाचे उपचारात मनच नसते हे आहे. आणि ही गोष्ट आपण अगदी बारकाईने निरिक्षण केले तर अ‍ॅडमिशनला जेव्हा ही मंडळी येतात तेव्हाही कळून येते.

एखाद्याला खरोखर व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर त्याला घाई लागलेली असते. पण असं पाहिलं आहे की घाई फक्त कुटूंबियांनाच लागलेली दिसते. व्यसनी माणूस अगदी स्वस्थ बसलेला असतो. त्याला कसलिच घाई नसते. मग अनेक कारणे शोधली जातात. एक कारण म्हणजे आता “दिवाळी”चे दिवस आहेत. आता कशाला दाखल व्हायचं? दिवाळीनंतर पाहु. खरं तर मुक्तांगणमध्ये दाखल झालेल्यांना घरची आठवण येऊ नये म्हणून मुक्तांगणमध्येच अगदी फराळासहीत सांग्रसंगीत दिवाळी साजरी केली जाते.

बरं दिवाळीपर्यंत थांबायचं म्हणजे हा माणूस तोपर्यंत दारुपासून दूर राहाणार का? तर बिलकूल नाही. मग दिवाळीसंपेपर्यंत दाखल व्हायचा दिवस लांबवण्याची गरज काय? कारण व्यसन सोडावं असं अनेकांना सुरुवातीला तरी मनापासून वाटत नाही हेच यामागचं खरं कारण आहे.

तरीही माणसे मुक्तांगणमध्ये दाखल व्हायला का येतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...